हरयाणा निकालाचा महाराष्ट्रात फायदा !

Maharashtra Assembly Elections फेक नॅरेटिव्हला ब्रेक

    दिनांक :11-Oct-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
 
- मोरेश्वर बडगे
Maharashtra Assembly Elections महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना महाआघाडीमध्ये टांगा पलटीची उठापटक सुरू आहे. ‘आम्ही एक आहोत' सांगणारे महाआघाडीमधील नेते आता ‘हम आपके है कौन?' मोडवर आले आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हायचे आहे. काँग्रेस तसेच शरद पवार याला तयार नाहीत. ‘निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू' असे सांगून या दोघांनी ठाकरेंचे झुरळ झटकले आहे. दबतील तर ते उद्धव कसले? मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंचे पोस्टर्स झळकले आहेत. मात्र, मुख्यमंत्रिपदावर दावा करायचा तर किमान १०० जागा लढायला पाहिजेत. ते जुगाड जमत नसल्याने उद्धव अस्वस्थ आहेत. Maharashtra Assembly Elections हतबल आहेत. बंडही करू शकत नाहीत. स्वबळावर लढायचे असेल तर तसे जाहीर करा, असा टोला काँग्रेसने त्यांना हाणला. काँग्रेसला वगळून आणि शरद पवारांना घेऊन धमाका करायचा ठाकरेंचा डाव असू शकतो; पण ते होणे नाही. कारण पवारांचे गेम काही वेगळे आहेत. पवारांच्या जाळ्यात ठाकरे पूर्णपणे फसले आहेत. हतबल आहेत. बंड केले तर राजकारणच खल्लास!
 
 
 
Maharashtra Assembly Elections
 
 
Maharashtra Assembly Elections लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात दणका बसला. विधानसभेसाठीही महायुतीच्या विरोधात वातावरण आहे, असा नॅरेटिव्ह विरोधकांनी चालवला आहे. या पृष्ठभूमीवर हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल साऱ्यांना चकित करणारे आहेत. सगळ्या एक्झिट पोल्सचे निष्कर्ष हरयाणाच्या मतदारांनी खोटे ठरवले. यापुढे कोणी एक्झिट पोल्स पाहणार नाही एवढा जबरदस्त हा दणका आहे. हरयाणात भाजपाने हॅट्ट्रिक केली. तेथे भाजपाच्या विरोधात वातावरण आहे, असे झाडून सारे सांगत असताना हे घडले. Maharashtra Assembly Elections फेक नॅरेटिव्हला ब्रेक लागला. काँग्रेसची पंगत उठली. राहुल गांधींची जिलेबी आता कोण खाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच याचे श्रेय दिले पाहिजे. मोदी म्हणजे चमत्कार आहे. एक्स्पायरी डेट नसलेले हे नेतृत्व आहे. चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि तीन वेळा देशाचे पंतप्रधान अशी सलग तब्बल २३ वर्षे सत्तेत राहूनही मोदींचा तजेला कायम आहे. गेल्या १० वर्षांत सर्वाधिक आंदोलने हरयाणाभोवती झाली. दिल्लीच्या वेशीवर तर हजारो शेतकरी ठिय्या देऊन बसले होते. महिला मल्लांच्या शोषणाचा विषयही तापवला गेला.
 
 
 
 
Maharashtra Assembly Elections शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असते ते तीन कृषी कायदे मागे घ्यायला मोदींना भाग पाडले गेले. सामान्य मतदार हा सारा तमाशा मुकाट पाहत होता. संधी मिळताच त्याने इंगा दाखवला. काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे नेते मुस्लिम तुष्टीकरणात मश्गुल होते. मुस्लिम, दलित आणि जातीची गणितं मांडून आपण सत्तेची लढाई जिंकू, असे त्यांना वाटायचे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना थोडा फायदाही झाला; पण त्यांना अंडरकरंट समजलाच नाही. लोकसभेत हिंदू  मतांना तडाखा बसला, हे लोकांना आवडले नाही. Maharashtra Assembly Elections ते सावध झाले आणि त्याचा निकाल आपल्याला हरयाणात दिसला. अवघ्या दीड महिन्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. हरयाणाचा निकाल भाजपासाठी बूस्टर डोज आहे.  हायुतीसाठी तर शुभशकून आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार चालवला. घटना बदलण्यासाठी मोदींना ४०० जागा हव्या आहेत, असा प्रचार केला गेला. लोकांच्या ते उशिरा लक्षात आले. हरयाणामध्ये विरोधकांचा फेक नॅरेटिव्ह चालला नाही; तसाच तो महाराष्ट्रातही चालणार नाही.
 
 
 
 
Maharashtra Assembly Elections महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट टक्कर आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांत फूट पडल्यानंतरची ही निवडणूक आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत तर महायुतीत भाजपासोबत एकनाथ शिंदे सेना आणि अजित पवार या दोघांचे पक्ष आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंंबरला संपते. त्या आधी निवडणूक घेऊन निकाल लावायचा आहे. येत्या आठ दिवसात निवडणुकीची आचारसंहिता लागेल. Maharashtra Assembly Elections मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. जागावाटप झालेले नसल्याने उमेदवारही जाहीर झालेले नाहीत. नवरात्रीत उमेदवारांची पहिली यादी येईल. त्यानंतर निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने तापेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. प्रत्येकाला आमदार व्हायचे आहे. इच्छुकांची संख्या काही हजारात आहे. यावेळी तर निवडणुकीच्या मैदानात चेंगराचेंगरी पाहायला मिळेल असे दिसते. तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्या ठळकपणे मैदानात आहेत.
 
 
 
Maharashtra Assembly Elections याशिवाय प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी, बच्चू कडूंची तिसरी आघाडी, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हेही आखाड्यात उतरत आहेत. तिकीट नाकारले म्हणून लढणाऱ्यांची संख्या यावेळी मोठी असेल. ओबीसींमधून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेले वर्षभर आंदोलन चालवले, सहा उपोषणं केली. निवडणुकीत लढायचे की पाडायचे? जरांगे यांनी निवडणूक लढायचे ठरवले तर या वेळची निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. मराठे कुदले तर ओबीसी समाजही उतरेल. ओबीसी ही व्होट बँकही मोठी आहे. मराठे विरुद्ध ओबीसी असे वळण लागेल. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे लढत होते का? या प्रश्नाचे उत्तरही मिळेल. Maharashtra Assembly Elections सध्या शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग जोरात आहे. पण म्हणून शरद पवारांची हवा आहे, असे मानायचे कारण नाही. प्रत्येक निवडणुकीला आयाराम-गयाराम पाहायला मिळतात. शरद पवार भाजपाच्या नेत्यांना आपल्याकडे घेत आहेत, याचा अर्थ त्यांच्याकडे तगड्या उमेदवारांची वानवा आहे. पवारांचा पक्ष हा कधी पक्ष नव्हताच. निवडून येऊ शकणाऱ्या धनदांडग्या पुढाऱ्यांची मोळी म्हणजे पवारांची पार्टी. दर निवडणुकीला पवार असे पुढारी शोधतात. त्या जोरावर ५-५० आमदार निवडून आणायचे, सरकारमध्ये घुसायचे, असाच पवारांचा खाक्या राहिला आहे.
 
 
 
Maharashtra Assembly Elections नरेंद्र मोदी आल्यानंतर ब्रेक बसला तेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे चॉकलेट दाखवून फोडले. पुढे फडणवीसांनी ठाकरेंची शिवसेनाच फोडली, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले तेव्हापासून ठाकरेंचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. ‘पारिजात दारी, मात्र फुले पडती शेजारी' अशी ठाकरेंची अवस्था आहे. ठाकरेंचे उपद्रव मूल्य संपले, हे धूर्त पवारांच्या केव्हाच लक्षात आले. त्यांनी ठाकरेंना भाव देणे बंद केले आहे. ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे; पण कसे होणार? भाजपाने त्यांच्या घरवापसीचे दोर केव्हाच कापले आहेत. त्यामुळे ठाकरेंनी वेगळे दबावतंत्र सुरू केले आहे. आता तर जागावाटपावरून महाआघाडीमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. ठाकरे सेनेचे मुखपत्र ‘सामना'च्या अग्रलेखात काँग्रेसला डिवचले. हे दोघे आपसात संपतील. तुम्ही लिहून ठेवा; निकालानंतर काँग्रेस ठाकरेंच्या सोबत बसणार नाही. निकालानंतर वेगळीच समीकरणे उदयाला येतील. त्यामध्ये महाआघाडीचा सुपडा साफ झालेला असेल.