Hindutva राम मंदिराच्या उभारणीचे सर्वच श्रेय कारसेवकांचे आहे, हे विसरून चालणार नाही. तरुण भारतने स्वप्नपूर्ती विशेषांक काढून कारसेवकांचा सन्मान केला, ही बाब आमच्या सारख्या त्या चळवळीतील लोकांना आनंद देणारी आहे. राम मंदिराने देशातील राजकीय परिस्थिती अजूनच मजबूत केली. गेल्या तीन वर्षात अनेक निर्णय देशहिताचे झाले. भविष्यातही होतील असा विश्वास व्यक्त करून सर्वत्र हिंदुत्वाचा जय जयकाराचे युग सुरू झाले, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.
ते काल 21 रोजी वर्धेत आले असता सायंकाळी गोलबाजार परिसरातील वास्तूविशारद गोकुळ व्यास यांच्या निवासस्थानी अनौपचारिक गप्पामध्ये तरुण भारत सोबत बोलत होते. डॉ. तोगडिया पुढे म्हणाले राम मंदिराचे निर्माण होणे हे अशोक सिंगल आणि आपले स्वप्न होते. ते पुर्ण होणार असल्याचा ठाम विश्वास आम्हाला होता. आम्ही मंदिरासाठीची डिझाईन तयार केली होती. 32 वर्षात 60 हजार घनफूट दगड मंदिराच्या बांधकामासाठी तयार झालेला होता. आपल्याला 22 जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले. आपण ते स्वीकारत अयोध्येत गेलो. तेथे जाऊन आपण अन्नछत्रात असलेल्या शहीद कोठारी बंधूंच्या भगिनीची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तो क्षण आपल्यासाठी अतिव आनंदाचा होता. आपणही अयोध्येत कारसेवकांचा सत्कार केला, असे त्यांनी सांगितले.
आपण देशात सतत प्रवासात असता आगामी लोकसभा निवडणुकांकडे आपण कसे बघता असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की हिंदूंच्या दृष्टीने जे जे हवे होते ते ते होते आहे. देशात 370 कलम काढणे तसे अवघड होते. ते काढल्या केले. त्यापेक्षा समान नागरी कायदा करणे सोपे होते. 370 कलम काढल्या गेली याचा अर्थ आता हळूहळू अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवता येईल. जनसंख्या नियंत्रण कायदाही येईल, काशी-मथुरा होऊन जाईल.Hindutva देशात हिंदुत्वाचा जयजयकार झाला पुढेही हिंदुत्वाच्या जयजयकाराचे युग सुरू झाले, डॉ. तोगडीया म्हणाले. यावेळी युवा समाजसेवक व उद्योजक प्रदीप बजाज, राष्ट्रीय बजरंगदलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जयस्वाल, विजय व्यास यांची उपस्थिती होती.