खोकल्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त निराधार वैद्यकीय अधिष्ठाता यांचे स्पष्टीकरण

वैद्यकीय तपासणीतून निष्कर्ष

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
vasantrao-naik : पिंपळखुटी येथील सहा वर्षीय मुलाचा मृत्यू खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी केले आहे. कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील शिवम सागर गुरुनुले हा मुलगा यवतमाळ येथील तारक बाल रुग्णालयात ताप, खोकला व उलटीसाठी बाह्यरुग्ण म्हणून इलाज घेत असताना 7 ऑक्टोबर रोजी त्याच्या घरी जेवण करताना कोसळला.
 
 
 
ytl
 
 
 
त्याला तारक रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला असता रुग्णाच्या श्वसननलिकेमध्ये शेंगदाण्याच्या सालीसोबत जेवणाचे अंश आढळले. पुढील तपासणीसाठी अवयव व व्हिसेरा राखून ठेवला आहे.
 
 
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली असून, त्यांनी संबंधित फार्मसीकडून औषधांचे नमुने ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे. डॉ. सारंग तारक यांनी अहवालानुसार, रुग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण ‘अन्नाचे अंश श्वसन नलिकेत गेल्याने’ झाल्याचे म्हटले आहे. मृत्यू खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचे वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक नोंदही तशीच आहे.
 
 
त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या प्रकरणावर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन बालरोग विभागप्रमुख डॉ. अजय केशवाणी व शवविच्छेदन अधिकारी डॉ. जयदेव बोरकर यांनी दिली आहे.