गडचिरोली,
Avinash Ponda award दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्याच्या विकासाचा उल्लेखनीय कार्य करणार्या जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना ‘आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन’ या राष्ट्रीय पुरस्काराने 17 ऑक्टोबर रोजी सन्मानित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे झालेल्या समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणारा गडचिरोली हा महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा ठरला आहे.
विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र, दुर्गम आदिवासी पाडे अशा प्रतिकूल परिस्थितीत आदी कर्मयोगी अभियानाला प्रतिसाद देणारा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने राबविला. जिल्ह्यात 553 आदी सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली. 553 ग्रामसभांद्वारे सुमारे 53 हजार नागरिकांचे एकत्रीकरण करून शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेले ग्राम कृती आराखडे तयार करण्यात आले. सामुदायिक वनहक्क कायद्यांतर्गत ग्रामसभांना 5.12 लाख हेक्टरांपेक्षा अधिक वनजमीन व्यवस्थापनासाठी सुपूर्द केली. तसेच 497 ग्रामसभांची मनरेगांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली.
17 विभागांमार्फत समन्वय
या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 17 विविध विभागांमध्ये समन्वय साधून एकात्मिक प्रशासकीय मॉडेल उभारण्यात आले. या लोकाभिमुख व परिणामकारक कामगिरीमुळे गडचिरोली जिल्हा ‘आदी कर्मयोगी अभियान’ अंतर्गत देशभरातून निवडला गेला.