तभा वृत्तसेवा हदगाव,
National Cyber Security Campaign नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि भोकर उपविभागीय अधिकारी डि. एस. हाके यांच्या आदेशांनुसार, सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनात मनाठा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांना सायबर गुन्हे आणि मोबाईल वापरातून होणाèया फसवणुकीबाबत जागरूक करण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, फेक अकाऊंट्स व फेक न्यूजपासून सावध राहण्याचे उपाय, तसेच ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती (उदा. मोबाईल क्रमांक, ओटीपी, पासवर्ड इ.) कोणालाही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले. ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे मानसिक व आर्थिक परिणाम, तसेच सायबर गुन्हा झाल्यास तक्रार कशी नोंदवायची, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. व्हॉट्सअॅपवरील फसवे मेसेज, अफवा व फेक लिंक्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमानंतर गावकèयांचे प्रश्न ऐकून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. शेवटी सर्वांना सायबर सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पळसा ग्रामपंचायत कार्यालयात देखील राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी सरपंच आशा प्रभाकर धाडेराव, उपसरपंच संजय काला, माजी सरपंच रणजित कांबळे, ग्रामसेवक अनिल कदम, दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मस्के, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.