वाराणसी,
IndiGo emergency landing, कोलकाताहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइट क्रमांक 6E-6961ला बुधवारी दुपारी अचानक इंधन गळतीची समस्या उद्भवल्याने वाराणसीच्या लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या विमानात एकूण १६६ प्रवासी आणि क्रू सदस्य होते. सुदैवाने, सर्वजण सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही घटना दुपारी सुमारे ४ वाजून १० मिनिटांनी घडली. विमानातील तांत्रिक टीमला इंधन गळतीचा संशय येताच, वैमानिकाने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. काही मिनिटांतच विमान वाराणसीच्या रनवेवर सुरक्षितपणे उतरले. विमान उतरताच सर्व प्रवाशांना सावधगिरीने बाहेर काढण्यात आले आणि टर्मिनलच्या आगमन विभागात सुरक्षितपणे हलवण्यात आले.विमानतळ प्रशासन आणि इंडिगोच्या तांत्रिक पथकाने तत्काळ विमानाची तपासणी सुरू केली असून, प्राथमिक तपासणीत इंधन गळती हीच संभाव्य कारणीभूत तांत्रिक समस्या असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सविस्तर तांत्रिक अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.या प्रकारानंतर अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावरून वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या तत्परतेचे कौतुक केले. काही प्रवाशांनी लिहिले की, "क्रूने अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली आणि आमचं प्राण वाचवलं." अनेकांनी इंडिगोच्या व्यावसायिक कार्यशैलीची प्रशंसा करत कंपनीच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे आभार मानले.वाराणसी विमानतळ प्रशासनानेही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "संपूर्ण आपत्कालीन लँडिंग प्रक्रिया सुरक्षितपणे पार पडली असून कोणतीही इजा झालेली नाही. क्रूने अतिशय शिस्तबद्ध आणि दक्षतेने काम केलं."
विशेष म्हणजे, IndiGo emergency landing, याआधीही १४ ऑक्टोबर रोजी असाच प्रकार समोर आला होता. तेव्हा कोलकात्याच्या दिशेने जाणारी एक इंडिगो फ्लाइट अगरतला विमानतळावर परतवावी लागली होती, कारण पक्ष्याशी टक्कर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या वेळीही क्रूच्या तात्काळ निर्णयामुळे मोठा अपघात टळला होता.वाराणसीतील ही घटना इंडिगोच्या विमानसेवेतील अलिकडच्या काळातील दुसरी आपत्कालीन लँडिंग असून, वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे विमान सेवांच्या तांत्रिक देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र, या घटनेत क्रूच्या योग्य आणि त्वरित प्रतिसादामुळे एक संभाव्य मोठा अपघात टळल्याचे स्पष्ट झाले आहे.एअरलाईन आणि विमानतळ प्रशासन या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून, पुढील उड्डाणे केवळ संपूर्ण तपासणी आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.