नागपूर,
Bachchu Kadu-Manoj Jarange : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आज दोन प्रभावी नेते 'बच्चू कडू आणि मनोज जरांगे' एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणाने आंदोलनात नवचैतन्य निर्माण केले आहे.
बच्चू कडू म्हणाले, “काल न्यायालयाचा आदेश आला आणि त्याच दिवशी पावसानेही हजेरी लावली. मी उपोषण सोडल्यानंतर पेंडलसुद्धा कोसळले, पण आंदोलनाची ताकद कमी झाली नाही. जरांगे यांनी तत्काळ फोन करून सांगितले की ते शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.”
ते पुढे म्हणाले, “आज सर्व शेतकरी नेते एकत्र आले आहेत, हे आंदोलनाचं मोठेपण आहे. मी कर्जमुक्तीसाठी मारण्यासाठी सुद्धा तयार आहे. आंदोलन करण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही, कारण माझा शेतकरी सर्व समाजात आहे.”
मनोज जरांगे यांनी भावनिक भाषणात सांगितले, “मी इथे आलोय शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून. आंदोलनाचे खरे बळ म्हणजे आंदोलकच असतो. बच्चू काल बोलत होते, पण लोकांनी ते गंभीरपणे घेतले नाही. आता दिशा ठरवण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. मतभेदांना मनभेद होऊ देऊ नका.”
दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा आणि व्यापक एकता लाभल्याचे दृश्य आंदोलनस्थळी पाहायला मिळाले.