मुंबई,
children hostage at RA Studio in Powai मुंबईत खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. पवई परिसरात रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने तब्बल २० ते २२ अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवले. ही सर्व मुल १५ वर्षांखालील असून, गेल्या काही दिवसांपासून त्या भागात ‘शूटिंग ऑडिशन’च्या नावाखाली हालचाली सुरू होत्या. परंतु, अचानक या ऑडिशनच्या ठिकाणीच मुलांना ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ समोर आला आणि मुंबई पोलिसांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी तत्काळ पोलीस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडो दाखल झाले.

तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना, दीर्घ प्रयत्नांनंतर पोलिसांनी रोहित आर्यला ताब्यात घेतलं आणि सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी रोहित आर्य मानसिकदृष्ट्या अस्थिर नसून त्याने ‘माझ्या काही साध्या मागण्या आहेत’ असं सांगत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. रोहित आर्यने आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे की, मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना ओलीस ठेवलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या मागण्या साध्या आहेत. मला काही लोकांशी बोलायचं आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत.”त्याने पुढे म्हटलं की, मी पैशांची मागणी केलेली नाही. १ मेपासून मी शांततामय आंदोलन करत होतो, उपोषणही केलं. पण कोणी ऐकलं नाही. आता मी तीव्र उपोषण सुरू केलं आहे, पाणी सुद्धा घेणार नाही.
त्याने आपल्या वक्तव्यात जर माझं गांभीर्य समजलं नाही, तर जय श्रीराम! असं उद्गार काढले. या वक्तव्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली होती. तथापि, पोलिस आणि सुरक्षा दलांच्या वेगवान कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून सर्व मुलं सुरक्षित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. मुंबईत अशा प्रकारचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, रोहित आर्यच्या या कृत्यामागील कारणं आणि त्याच्या मागण्या नेमक्या काय आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे.