देसाईगंज,
krishna gajabe गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे कापणी झालेल्या धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी मेहनतीने वाढवलेली पिके शिल्लक राहिली नाहीत, तोंडाशी आलेला घास अक्षरशः निसटल्यासारखे झाले आहे. अवकाळी पावसाने फक्त धानच नव्हे तर सर्व शेतपिकांना आता फटका बसला आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक धान असल्यामुळे त्याचे नुकसान सर्वाधिक झाल्याचे दिसून येत आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे हे आज, 31 ऑक्टोबर रोजी शेतकर्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी तलाठी व प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत पाहणी केली.
 
 
 
 
 
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, दादाजी मेश्राम, भगवान मेश्राम यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी यावेळी करण्यात आली. शेतकर्यांच्या समस्या ऐकून घेत तातडीने पंचनामे करण्याच्या आणि नुकसानभरपाई निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिल्या. या अवकाळी पावसामुळे परिसरातील अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. 
माजी आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यांतील तहसीलदार व संबंधित प्रशासकीय अधिकार्यांशी संपर्क साधून, पुढील 24 तासात बाधित शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असा स्पष्ट आदेश दिला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची शासनस्तरावर तातडीने भरपाई मिळावी, यासाठी सरकार मोहिमेद्वारे करू शकते, असा विश्वासही त्यांनी शेतकर्यांना दिला.
यावेळी माजी आमदार गजबेंसोबत तालुकाध्यक्ष सुनील पारधी, तलाठी ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, शेषराव नागमोती, भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, सुरेश झिलपे, विनायक पारधी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. याप्रसंगी बाधित शेतकर्यांनी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती उपस्थितांना दिली.
शासन आपलेच असल्याने बाधित शेतकर्यांना मदतीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही माजी आमदार गजबे यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाने शेतकर्यांच्या नुकसानीला भरपाईसाठी निधी तत्काळ मंजूर करावा, अशीही मागणी त्यांनी केली. स्थानिक प्रशासनही शेतकर्यांच्या हितासाठी तत्काळ कार्यवाहीस सज्ज असल्याचे आढळले.krishna gajabe यावेळी उपस्थित शेतकर्यांमध्ये समाधानाचे आणि आश्वासक वातावरण दिसून आले.