ढगफुटी होऊनही अल्लीपुरात दिवसाआड पाणी पुरवठा

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
अल्लीपूर,
water shortage उन्हाळ्यात पाणी पुरवठा योजना डबघाईस आल्याने एक ते दोन तर कधी तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. पण, यंदाच्या पावसाळ्यात ढगफुटी होऊनही सद्यस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यत केला जात आहे.
 

monsoon water shortage Allipur 
गावाला यशोदा नदीतून कायमस्वरुपी पाणी पुरवठा होतो. ग्रामपंचायतजवळ दोन लाख क्षमतेची पाण्याची टाकी असली तरी आता ती जिर्ण झाल्याने जमिनदोस्त करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा परिसरात एक लाख क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली. पण, ती टाकी एवढ्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहे. त्यामुळे कात्री येथील ८ कोटींची योजना पांढरा हत्ती ठरत आहे. बाराही महिने या ना त्या कारणांमुळे योजना बंद राहते. अल्लीपूर येथील पाणी फिल्टर योजनाही पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
प्रशासक असल्यामुळे व प्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक नागरी सुविधांवर लक्ष द्यायला प्रशासकांना वेळ नाही. त्यामुळे अल्लीपूरवासींना आता थेट ढगाचेच पाणी घेण्याची वेळ आली आहे. यासंबंधी माहिती घेतली असता दोन पाईप फिल्टर लाईनला जोडल्यावर सर्वत्र पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुरू राहील, अशी प्रतिक्रीया ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली