जम्मू,
Vaishnodevi pilgrimage stopped खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रसिद्ध श्री माता वैष्णोदेवी यात्रा पुढील तीन दिवसांसाठी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागानेजम्मू-काश्मीरसाठी पुढील ७२ तासांसाठी तीव्र पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. यामुळे कटरा ते भवन या मार्गावर भूस्खलन आणि रस्ते अडथळ्यांचा धोका वाढला असल्याचे प्रशासनाने सांगितले. या पार्श्वभूमीवर ५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ८ ऑक्टोबरपासून पुन्हा यात्रा सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
श्राइन बोर्डाने सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या खराब हवामानाच्या इशाऱ्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करून वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. हवामान स्थिर झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. Vaishnodevi pilgrimage stopped दरम्यान, कटरा येथे थांबलेल्या यात्रेकरूंकरिता पर्यायी निवास आणि अन्नपुरवठ्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून, बचाव आणि मदत पथके सज्ज आहेत. डोंगराळ भागात होणाऱ्या संभाव्य भूस्खलनावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
श्राइन बोर्डाने यात्रेकरूंना आवाहन केले आहे की, हवामान सामान्य होईपर्यंत त्यांचा प्रवास पुढे ढकलावा आणि अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनद्वारे ताज्या अपडेट्सची माहिती घ्यावी. स्थानिक प्रशासन आणि हवामान विभाग सतत परिस्थितीचे परीक्षण करत असून, पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर तीर्थयात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.