नवी दिल्ली
Oman चांगल्या रोजगाराच्या आशेने ओमानमध्ये गेलेल्या आणि तेथे गंभीर अडचणींना सामोरे जात असलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुखरूप सुटका करण्यात भारत सरकारला यश आले आहे. या कारवाईमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कसे तत्पर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सदर घटनेचा Oman तपशील पुढे येत असताना असे स्पष्ट झाले की, हे कामगार वेगवेगळ्या एजंटमार्फत ओमानमध्ये पाठवले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात तेथील स्थिती अत्यंत भयावह होती. कामगारांकडून सक्तीने काम करवून घेणे, त्यांना पगार उशिरा किंवा अपुरा देणे, त्यांच्या पासपोर्टचा ताबा ठेवणे, आणि त्यांना अतिशय कमी जागेत ठेवणे, हे प्रकार सातत्याने सुरू होते. काहींच्या नावावर त्यांच्या परस्पर संमतीशिवाय कर्जही घेतले गेले होते. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास अटक करण्याची धमकी दिल्याने ते पूर्णपणे असहाय्य झाले होते.या प्रकाराची माहिती उत्तर मुंबईतील एका भाजप पदाधिकाऱ्याने केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांना दिल्यानंतर प्रकरणाला गती मिळाली. गोयल यांनी हे प्रकरण सर्वोच्च प्राधान्याने हाताळण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर भारत सरकारने ओमानमधील भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधून या कामगारांच्या सुटकेसाठी आवश्यक ती पावले उचलली.
भारतीय दूतावासाने ओमानमधील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने शोध मोहीम राबवत १८ कामगारांचे स्थान ठरवले. त्यानंतर तपास अधिक खोलवर नेल्यावर आणखी १८ भारतीय कामगार गंभीर अत्याचारांना बळी पडल्याचे समोर आले. सर्व ३६ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक गुरुद्वारात आश्रय देण्यात आला.
कामगारांच्या सुटकेनंतर त्यांना भारतात परत आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. काही दिवसांतच सर्व कामगारांना सुखरूप भारतात परत आणण्यात आले. त्यांच्या सुखरूप परतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा दिलासा घेतला असून, भारत सरकारच्या या तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पार्श्वभूमीवर, Oman पीयूष गोयल यांनी भारतातून परदेशात कामाच्या शोधात जाणाऱ्या नागरिकांना महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही एजंट किंवा संस्था यांच्या माध्यमातून परदेशात जाण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी, कागदपत्रे आणि नेमकी नेमणूक कोणत्या प्रकारे केली जात आहे, याची काळजीपूर्वक तपासणी करावी. वेळेवर घेतलेली सावधगिरी भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवू शकते, असेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये घडलेल्या आणखी एका घटनेत, गिनी येथे मुंबईतील एका भारतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात अडचणी येत होत्या. त्या वेळीही भारतीय दूतावासाच्या माध्यमातून भारत सरकारने तत्काळ हस्तक्षेप करत मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला होता.
या घटना स्पष्टपणे दाखवतात की, भारत सरकार परदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. मात्र नागरिकांनीही परदेशात जाण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही या प्रकरणातून अधोरेखित होते.