मुंबई
IAS officer transfers महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेत मोठा फेरबदल करत सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या पदांवर बदली केली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी, नाशिक, जळगावसारख्या जिल्ह्यांसह पुणे व मुंबईतील काही प्रमुख प्रशासकीय स्थानांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, स्थानिक प्रशासन व विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सायंकाळी उशिरा राज्य सरकारने बदली यादी जाहीर केली. यानुसार, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची बदली मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली नाशिक येथे कुंभमेळा आयुक्तपदी करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून झाली आहे.जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नाशिक जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, तर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आता जळगावचे नवे जिल्हाधिकारी असतील.
शिवशाही IAS officer transfers पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. या पदासाठी साखर उद्योगातील महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय नेतृत्वात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता असून, विशेषतः नाशिक, पुणे, रत्नागिरी, जळगावसारख्या जिल्ह्यांमधील विविध विकास योजना आणि नागरी सुविधा प्रकल्पांच्या गतीवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या अधिकाऱ्यांना स्थानिक प्रश्नांची नव्याने जाण करून घेऊन कार्यवाही करावी लागणार आहे. आगामी काळात या अधिकाऱ्यांच्या कारभाराचा परिणाम विकासाच्या गतीवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर कितपत होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.