बुलढाणा,
kiran-patil : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक बुधवारी चिखली एमआयडीसीत संपन्न झाली. निर्यातीवर भर देत उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.
या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गुठळे, तहसिलदार संतोष काकडे, जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक कोमलेंद्र कुमार सिंह, विविध विभाग व बँकांचे अधिकारी, असोशिएशनचे पदाधिकारी, निर्यातदार व उद्योजक उपस्थित होते.
या जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी उद्योजकांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रशासकीय स्तरावरील समस्या जाणून घेत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात त्यांनी जिल्ह्याला एमआयडीसीचा स्वतंत्र अधिकारी असावा अशी मागणी शासनाला केली असल्याची माहिती दिली. तसेच एमआयडीसीतील विद्युत पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी एसप्रेस फिडरची सुविधा उपलब्ध करावी. सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, चौकी सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे. असोशिएशनचे कार्यालय कार्यान्वित करावे,अशा सूचना त्यांनी क दिल्या.
निर्यात हे जिल्ह्याचे बलस्थान आहे. जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यातीसाठी प्रयत्न करावे. नव उद्योजकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करावेत. नव युवकांनी योजनांचा लाभ घ्यावा. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी. त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांना प्रोत्साहित करावे. जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी सर्वप्रथम उद्योजकांना असोशिएशन मजबूत करा. औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसदर्भात अधिकार्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना नियमित भेट देवून पाहणी करावी. उद्योजकांसमवेत चर्चा करुन नियमित आढावा घ्यावा. प्रशासकीय कार्यपद्धतीत बदल करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.