मुंबई,
Saif Ali Khan लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याने वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या घरात झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल अखेर मौन सोडले आहे. या हल्ल्यात सैफच्या पाठीमागे, विशेषतः मणक्याजवळ गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यामुळे त्याला जवळपास एक आठवडा रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. मात्र, रुग्णालयातून बाहेर पडताना सैफ अगदी शांत, संयमी आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ दिसत होता, यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळाच चर्चेचा विषय निर्माण झाला होता. काहींनी त्याच्या संयमाचे कौतुक केले, तर काहींनी ही संपूर्ण घटना ‘खोटी’ आणि ‘स्टंट’ असल्याचा दावा केला.
‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या वेब शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सैफने या घटनेबाबत प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली. शोच्या सूत्रसंचालिका काजोलने जेव्हा विचारले की इतक्या गंभीर दुखापतीनंतरही तू रुग्णालयातून चालत कसा बाहेर आलास, तेव्हा सैफने दिलखुलास उत्तर दिले.
"हे सगळं खरंच वाईट होतं, पण ठीकही होतं," असे सांगताना सैफ म्हणाला, "घटनानंतर तिथे काही लोक आले होते. मला बऱ्याच सूचना मिळाल्या – कसं बाहेर पडावं, कशा पद्धतीने प्रसारमाध्यमांसमोर यावं. पण मी ठाम होतो. मी म्हणालो, 'जर मीडिया उत्साही आहे, तर आपण हे व्यवस्थित हाताळायला हवं. मी चालू शकतो, मग मला रुग्णालयातून बाहेर जाऊ द्या.' टाके पडले होते, पाठेमागे दुखत होतं, पण व्हीलचेअरची गरज नव्हती."
सैफ पुढे म्हणाला Saif Ali Khan की, त्याच्या अंतरात्म्याने या प्रसंगात कोणताही नाट्यमय अँगल आणण्यास नकार दिला. "कोणी म्हणालं की, तुला अॅम्ब्युलन्समध्ये जावं लागेल. कोणी म्हणालं की, व्हीलचेअरवरूनच बाहेर पडावं लागेल. पण मला वाटलं की, माझ्या कुटुंबियांना, चाहत्यांना किंवा शुभचिंतकांना कोणतीही भीती किंवा चिंता वाटायला नको. त्यामुळे मी चालत बाहेर आलो आणि एक फोटो पाठवून इतकंच सांगितलं की मी ठिक आहे."मात्र, या शांततेने भरलेल्या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या. अनेकांनी सैफच्या जखमा आणि हल्ल्याच्या घटनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे सगळं बनावट असल्याचा आरोप केला. त्यावर प्रत्युत्तर देताना सैफ म्हणाला, "हेच विचार मनात होते – एक सोपा संदेश द्यायचा होता की मी ठीक आहे. पण यावर इतके रिऍक्शन्स आले, की लोक म्हणायला लागले की हे खोटं आहे, काही म्हणाले हे खरं आहे. पण आपण अशाच जगात राहतो. म्हणूनच मी असं केलं."
सैफ अली खानच्या या खुलाशाने एका चर्चित घटनेवर पडदा उघडला असून, त्याच्या संयमित व समजूतदार प्रतिक्रियेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, सेलिब्रिटी असण्यासोबतच माणूस म्हणूनही जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.