गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर बलुचिस्तान!मोबाइल इंटरनेट सेवा बंद

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Balochistan on the brink of civil war पाकिस्तानमध्ये सध्या गंभीर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, देशातील बलुचिस्तान प्रांत गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तान सीमेजवळ वाढलेल्या तणावानंतर आता बलुचिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून नागरिकांच्या हत्या, बलुच नेत्यांचे अपहरण आणि सततच्या सैनिकी कारवायांमुळे प्रांतभर असंतोष उसळला आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रांतीय गृह विभागाने संपूर्ण बलुचिस्तानमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.सुरक्षा सतर्कतेनुसार, राजधानी क्वेटा वगळता प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, हे पाऊल पूर्णपणे सुरक्षेच्या कारणास्तव उचलण्यात आले असून, ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. मात्र, क्वेटा जिल्हा या निर्णयातून अंशतः सूट मिळेल.
 
pakistan and afghanistan war
 
 
तथापि, राजधानी क्वेटामधील इंटरनेट वापरकर्त्यांनीही बुधवारपासून नेटवर्क सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. गृह विभागाने जिल्हा प्रशासन, पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी संप्रेषण व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सुरक्षा धोक्यांचा विचार करून क्वेटाच्या छावणी क्षेत्रातील सर्व शाळा देखील बुधवारपासून १६ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग एन-७०वरील लोरालाई विभागातील सर्व वाहतूक सेवा १४ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
 
 
काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तानमधील वाढत्या असुरक्षिततेमुळे पाकिस्तान रेल्वेने क्वेटा-पेशावर दरम्यान धावणाऱ्या ‘जाफर एक्सप्रेस’ची सेवा चार दिवसांसाठी थांबवली होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान ट्रेनची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. पाकिस्तानमधील या घटनाक्रमामुळे देशातील राजकीय व सामाजिक स्थैर्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, बलुचिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आता स्पष्टपणे व्यक्त केली जात आहे.