मुंबई,
Bihar elections : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून, महाआघाडीला मोठा पराभव झेलावा लागला आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आतापर्यंत मिळालेल्या निकालानुसार भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे उमेदवार तब्बल 96 जागांवर आघाडीवर आहेत, तर जेडीयूला देखील मोठं यश मिळालं असून ती 84 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या घटकपक्षांमध्ये काँग्रेसची अवस्था बिकट आहे; काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे. बिहारमधील या पराभवानंतर आता महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठा झटका बसला आहे, बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे.

ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी तडकाफडकी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. दयानंद चोरगे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे भिवंडीतील उमेदवार होते. आपल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असून, तरीही अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये डावलं गेल्याची खंत व्यक्त केली होती. बिहारच्या निकालानंतर दयानंद चोरगे यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बिहार निवडणुकीत महाआघाडी फक्त 29 जागांवर आघाडीवर राहिली, तर आरजेडी या घटकपक्षाला 25 जागांवर आघाडी मिळाली. काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे काँग्रेसमुळेच आरजेडीला अपेक्षित यश मिळाले नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेडीयूपेक्षा भाजपच्या जागा अधिक असल्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे.
या घटनांनी महाआघाडी आणि काँग्रेसच्या पक्षांमध्ये गदारोळ माजवला असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद अधिक दृढ झाल्याचे दिसत आहे, तर काँग्रेससाठी परिस्थिती बिकट झाली आहे.