नागपूर,
arun-mittal : “तेल आणि वायू क्षेत्रातील सुरक्षितता संस्कृती बळकट करण्यासाठी उद्योग आणि आपत्कालीन सेवांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे. प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी क्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ऑइल इंडस्ट्री सेफ्टी डायरेक्टरेट चे कार्यकारी संचालक अरुण मित्तल यांनी केले. गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूर आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत ओआयएसडी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच “तेल आणि वायू क्षेत्रातील अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा एनएफएससी कॅम्पसवर यशस्वीरीत्या पार पडली.

ओएनजीसीचे माजी संचालक (टी अँड एफएस) वेद प्रकाश महावर यांनी विशेष भाषण करत तेल-गॅस क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेतील आव्हाने आणि उपाय यांवर मार्गदर्शन केले. यावेळी ओडिशा एफ अँड ईएसचे मुख्य अग्निशमन अधिकारी देबेंद्र कुमार स्वैन, संचालक (ई अँड पी) सचिन केळकर, मुंबईचे नीरज लाल, तसेच एनएफएससीचे प्राध्यापक डॉ. ए. आर. सोनटके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत ऑफशोअर प्लॅटफॉर्मवरील आग व स्फोट जोखीम मूल्यांकन, औद्योगिक आपत्ती तयारी व प्रतिसाद, विमानवाहतूक क्षेत्रातील आपत्कालीन व्यवस्थापन, रिफायनरी व पेट्रोकेमिकल संकुलातील अग्निसुरक्षा, हायड्रोजन प्रणालीतील सुरक्षा, तसेच ऑनशोअर–ऑफशोअर ऑपरेशन्समधील जोखीम-आधारित सुरक्षा व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल तांत्रिक सादरीकरणे झाली. कार्यशाळेत तेल आणि वायू उद्योग, रिफायनरी, आपत्कालीन प्रतिसाद संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील ५३५ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. तज्ज्ञांचे अनुभवसंपन्न मार्गदर्शन आणि तांत्रिक चर्चा यांमुळे ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरली.