नागपूर,
devendra-fadnavis : प्रत्येक आदिवासींना राज्य शासनवन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती निमित्याने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षांतर्गत मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भगवान बिरसा मुंडा १५० व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जनजातीय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्याचे तसेच त्यांचे स्मारके उभारण्याचा कार्यक्रम दिला आहे. राज्य शासनानेही राज्यातील आदिवासी नायकांचा गौरवशाली इतिहास पुस्तकरूपाने आणला आहे. विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा विकास साधण्यात येत आहे.
‘धरती आबा कार्यक्रम’ देशभर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात आदिवासी समाजाच्या विकासासाठी ‘धरती आबा कार्यक्रम’ देशभर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ‘धरती आबा कार्यक्रम’ राबविण्यासाठी १७ मंत्रालयांच्या २५ योजना एकत्र करून ३२ जिल्ह्यातील ५ हजार गावांतील प्रत्येक आदिवासी पाड्यांवर पाणी, वीज, रोजगार आणि महिला विकासाच्या योजना पोचविल्या जात आहेत.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सर्वांगिक विकासाचा संकल्प
देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा हे या समाजाच्या अभिमान व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य समाज करीत असून त्यांच्या सर्वांगिक विकासासाठी संकल्प करण्याचे आवाहन यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जंगलात राहत असल्याने व शहरी भागापासून दूर असल्याने त्यांच्या विकासासाठी काम होणे गरजेचे आहे.
बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून बिरसा मुंडा यांच्या १५० जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. याद्वारे ४० हजार युवा-युवतींची नोंदणी व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जनजातीय गौरव वर्षांतर्गत करण्यात आलेल्या विविध आयोजनांची त्यांनी माहिती दिली. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजनामागील भूमिका व कार्यक्रमाची माहितीही त्यांनी दिली. दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण
सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण, शासकीय आश्रमशाळा पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण. शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी करण्यात आले.
कॉफीटेबल बुकचे प्रकाशन
आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा गौरवही त्यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते ’भगवान बिरसा यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रमय पुस्तका’चे आणि ’आदिवासी परंपरा व सर्जनशिलता’ यावर आधारित कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. आमदार सर्वश्री रविंद्र चव्हाण, डॉ. आशिष देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.