नागपुरात काँग्रेसला धक्का...वाडीत २२१ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Congress suffers setback in Nagpur विदर्भातील काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का! नागपूरमध्ये २२१ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी ठरवताना गटबाजी आणि मनमानी केल्याचा आरोप या राजीनाम्याच्या मागे आहे. नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपालिकेत मनमानी व गटबाजीला कंटाळून या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडली. वाडी पालिका क्षेत्रातील कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत.
 
 
Congress suffers setback in Nagpur
 
 
नगरपालिका अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उमेदवाराची निवड करताना विश्वासात न घेण्यात आल्यामुळे अनेक वर्षे पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा अपमान झाला, असा आरोपही या राजीनाम्याबरोबर जोडला जात आहे. राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय आहे की या पदाधिकारी पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करतील. काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रसन्ना तिडके यांनी सांगितले की, नाना पटोले यांच्या समर्थक म्हणून पक्षात अन्याय झाला असून नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटबाजी आणि नाराजी प्रकट झाली. ग्रामीण भागात वर्चस्व असणारे माजी मंत्री सुनील केदार आणि त्यांचे समर्थक, खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर त्यांनी गटबाजीचे आरोप केले.
दरम्यान, प्रसन्ना तिडके यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर असलेले नियंत्रण धोक्यात आले असून, आता मौदा परिसरात कमळ फुलवण्याची स्पर्धा आणि आगामी निवडणुकीच्या गतीविधींवर लक्ष केंद्रित झाले आहे. या घटनांमुळे विदर्भातील काँग्रेससाठी राजकीय वातावरण खूपच तणावपूर्ण झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठा धक्का बसला आहे.