गोरखपूर,
Rabies-infected cows in Gorakhpur गोरखपूरच्या रामडीह गावात एका रेबीज बाधित गायीच्या मृत्यूनंतर भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी गावात आयोजित एका धार्मिक विधीच्या वेळी सुमारे २०० ग्रामस्थांनी त्या गायीच्या कच्च्या दुधापासून बनवलेले पंचामृत भक्तीभावाने सेवन केले होते. गायीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सर्वांना रेबीजविरोधी लस घेण्याचा सल्ला दिला आणि आतापर्यंत १७० हून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.
गायीला तीन महिन्यांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. मालकांनी सुरुवातीला रेबीजविरोधी लस दिली, परंतु नंतर उपचारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गायीला रेबीजची लक्षणे दिसू लागली आणि ती दोन दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडली. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. धार्मिक कार्यक्रमाचे पंचामृत तयार करण्यासाठी गायीचे कच्चे दूध वापरले जात होते. श्रद्धेने पंचामृत सेवन करणाऱ्यांमध्ये यजमानांचे कुटुंब आणि नातेवाईकही होते. गायीला रेबीजचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गावात सावधगिरीची घंटा वाजली.
उरुवा प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) लोकांची मोठी गर्दी झाली असून डॉक्टरांनी पंचामृत सेवन करणाऱ्यांना तीन डोस रेबीज लसी देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत १७० हून अधिक ग्रामस्थांनी पहिला डोस घेतला असून, लोक अजूनही संसर्गाच्या धोका आणि जीवाशी संबंधित चिंतेत आहेत.