*विजय जावंधिया यांचा केंद्रीय मंत्र्यांना पत्राद्बारे सवाल
दिनांक :20-Nov-2025
Total Views |
वर्धा,
maize-producers इथेनॉलला ७१.३२ रुपये प्रती लिटरची एमएसपी गॅरंटी आहे. तर मका उत्पादक शेतकर्यांच्या शेतमालाला २४०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पण, या एमएसपीची गॅरंटी मका उत्पादकांना का नाही? असा सवाल उपस्थित करीत केंद्र सरकारने शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावे, अशा मागणीचे पत्र शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांना पाठविले आहे.
आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०१९ मध्ये देशातील अन्नदाता शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही त्याला ऊर्जा उत्पादक शेतकरी बनवू. यासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण तयार केले. ज्याचे समर्थन आणि प्रचार आपणही केला. सुरूवातीला साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. आता धान्य, तांदूळ आणि मका यापासून इथेनॉल तयार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. maize-producers भारत सरकारने इथेनॉल निर्माण करणार्या कारखान्यांसाठी सबसिडी योजना जाहीर केली आहे. शिवाय इथेनॉल खरेदीसाठी सरकारी धोरण देखील जाहीर करण्यात आले आहे. भारत सरकार इथेनॉल ७१.३२ रुपये प्रती लिटरच्या दराने खरेदी करण्याची गॅरंटी देते. यामुळे मक्याच्या मागणीत वाढ झाली होती. मागीलवर्षी शेतकर्यांना हमी भावापेक्षा जास्त भाव मिळाले होते. जे २४०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेले होते. या अनुभवामुळे देशभरातील शेतकर्यांनी मका उत्पादन वाढवला. तसेच उत्पादनही जास्त झाले. मात्र, आज शेतकर्यांना मका ११०० ते १९०० रुपये प्रती क्विंटल दरात विकावा लागत आहे. जर सरकार इथेनॉल खरेदी करण्यासाठी ७१.३२ रुपये प्रती लिटरची गॅरंटी देते, तर मका उत्पादकांच्या मक्याला २४०० रुपये प्रती क्विंटलची घोषित एमएसपीची गॅरंटी सरकार का देत नाही, असा सवालही विजय जावंधिया यांनी पत्राद्बारे विचारला आहे.