जळगाव
Sadhana Mahajan जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे राज्यातील राजकारणात मोठा घडामोडींचा ढग उठला आहे. काही ठिकाणी नगरपंचायत व नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार स्पर्धा होत असताना, काही भागांत राजकीय डावपेचांमुळे बिनविरोध निवडणुका घडवून आणल्या जात आहेत. यावेळी अनेक बड्या राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना तिकीट दिल्यामुळे काही राजकारण्यांची प्रतिष्ठा देखील धोक्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठ्या ताकदीने प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून महाजन कुटुंबाचा जामनेर नगरपालिकेतील विजय मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर विरोधी पक्षातील तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे साधना महाजन यांचा नगराध्यक्षपदी बिनविरोध विजय नक्की झाला आहे.
पहिली नगरपालिका
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडण्यासाठी मैदानात होते, परंतु त्यांनी माघार घेतल्याने जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे. आतापर्यंत उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील व नानाभाऊ बाविस्कर अशा अनेक उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.या विजयानंतर जामनेरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात नाच व गुलालाची उधळण केली जात आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मते, महाजन यांनी केलेल्या विकासकामांवर तसेच नेतृत्वावर मतदारांचा विश्वास जिंकला आहे. भाजपाच्या बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. येथे काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील व नथ्थू खडके माघार घेतल्याने कलोती यांचा विजय निश्चित झाला. या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार रवी राणाला फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.जामनेर आणि चिखलदरा येथे भाजपाच्या या विजयानंतर स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.