वर्धा,
wardha-news : वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून केव्हाच्याच हिसकून घेण्यात आल्या. शरद पवार गटाने काँग्रेसकडून लोकसभाही हिसकून घेतली. महाविकास आघाडीत नगर पालिका निवडणुकीसाठी अंतर्गत कलहाने आर्वीत ४ तर वर्धेत केवळ २३ जागांवर उमेदवार देण्यात आले. त्यामुळे यावेळीही महाविकास आघाडी वर्धा आणि हिंगणघाट येथे सत्तेपासुन दूर राहणार असल्याचे सांगण्यासाठी आता भविष्य वेत्याची गरज राहिलेली नाही.
वर्धा नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढण्याकरिता अनेक दिवस बैठकांचे सत्र चालल्यावरही ऐनवेळी आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची फजिती झाली आहे. नेत्यांमधील समन्वयाचा अभावाने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना फटका बसत आहे. आघाडी फिसकटल्याने वर्धा नपचे अध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या ४० पैकी प्रत्येकी २३ जागा लढवत आहेत. या दोन्ही पक्षांचे सदस्यपदाच्या प्रत्येकी १७ जागांवर उमेदवारच नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या २ पक्षांना एकत्र निवडणूक लढायची होती तर सर्वांच्या समन्वयातून जागावाटप का झाले नाही आणि सोबत लढायचे नव्हते तर पूर्ण जागा का लढवण्यात आल्या नाहीत, असा संताप दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यत करीत आहेत. दरम्यान, आम्हाला डावलून दोन्ही पक्षांतील काहींनी आघाडी ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेखर शेंडे यांनी केला आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी राजेंद्र मुळक यांच्यासोबत बैठक झाली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
खा. अमर काळे, काँग्रेसचे नेते रणजित कांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, माजी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व शहर अध्यक्ष मुन्ना झाडे अशी आमची बैठक झाली. पुढे कांबळे सोडून आमच्यात दोन तीनदा चर्चा झाली. त्यात वांदिले यांनी त्यांच्यासाठी २३ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला. पुढे चर्चा होऊन राष्ट्रवादीने १६ जागांवर, काँग्रेसने नगराध्यक्ष व २२ जागांवर, तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये दोन्ही पक्षांनी मैत्रिपूर्ण लढावे, असे ठरले होते शेखर शेंडे यांनी सांगितले.