मुंबई,
cold wave Maharashtra, महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीने जोर पकडला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभर गारठा वाढला आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५ अंश सेल्सिअसने खाली घसरले असून दुपारच्या वेळीही वातावरणात गारवा जाणवत आहे. नाशिकमध्ये तापमान ९.७ अंशांवर आले तर धुळे येथे राज्यातील सर्वात निचांकी ६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. निफाडमध्ये ७.४ तर परभणीत ८.४ अंशांपर्यंत पारा घसरला. भंडारा, आहिल्यानगर आणि नाशिकसह अनेक भागांत तापमानात सातत्याने घसरण दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत थंडी अधिक वाढण्याचा इशारा दिला आहे. नोव्हेंबरच्या २१ तारखेपासून थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली असून पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातही पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. वाढत्या गारठ्यामुळे शाळांचे वेळापत्रक पुढे ढकलावे, अशी मागणी अनेक पालक करत आहेत.
थंडीची तीव्रता cold wave Maharashtra वाढत असतानाच राज्यात पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील हवामानात व्यापक बदल होण्याची चिन्हे आहेत. पावसाच्या सरींनंतर थंडीचा कडाका आणखी तीव्र होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने अंदमान-निकोबार बेटांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ तीव्र होऊ शकते, असे हवामान विभागाने सांगितले. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना २३ नोव्हेंबरपर्यंत अंदमान समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.एका बाजूला देशभर थंडीची लाट, काही भागांत पावसाचा अंदाज आणि पूर्व किनाऱ्यावर चक्रीवादळाचा इशारा अशी तिहेरी हवामान परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानातील बदल अधिक जाणवणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.