नवी दिल्ली,
Tensions rise on the LoC आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव पुन्हा वाढला आहे. मागील काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या असून, यामध्येच भारतीय सैन्याची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोट आणि पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत. एलओसीवरील गस्तही आता दिवसरात्र चालवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या १३१ दहशतवादी सक्रिय आहेत, त्यापैकी ११७ पाकिस्तानी असून उरलेले १४ स्थानिक आहेत जे दहशतवाद्यांना लपवण्यात मदत करत आहेत. या दहशतवाद्यांची सीमेपलीकडून घुसखोरी करण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सैनिकांच्या गस्तीत आता पुरुषांसह महिलांचीही संख्या लक्षणीय आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर करून सीमेजवळ हालचाल केली गेल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सीमेवर उच्च अलर्ट जारी केला आहे. पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर दिल्लीतील लाल किल्ला परिसरात जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोट केला. सीमेवरील तणावामुळे भारतीय सुरक्षा दल सर्व बाजूंच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. पाकिस्तानकडून घुसखोरी किंवा इतर कुरापती होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतत सतर्क आहेत.