कारंजा (घा.),
tur dal seeds, येथील पुंडलिक केवटे यांनी एका प्रसिद्ध कंपनीचे तुरीच्या बियाण्यांची शेतात पेरणी केली. मात्र, या तुरीला पाच महिन्यानंतरही फुल धारणा न झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पुंडलिक केवटे यांची शेती दाभा गावाच्या हद्दीत असून त्यांनी ८ जून रोजी श्री चौधरी कृषी सेवा केंद्र कारंजा यांच्याकडून बियाणे खरेदी केले होते. सदर बियाणे तूर १३/७ हे वाण ४ महिण्यात येत असून त्यावर गहू पेरू शकतो, या आशेने त्यांनी पेरणी केली होती. १० जून रोजी लावणी करून सुद्धा आजपर्यंत या तुरीच्या झाडांना फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळवले असता त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. पण, फवारणी करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून एकरी १० विंटलप्रमाणे २.५ एकराचे २५ विंटलचे ३ लाख रुपये भरपाई द्यावी, अशी शेतकर्याची मागणी आहे. याबाबत येथील तालुका कृषी अधिकार्यांनी तक्रारीनंतर १७ रोजी मोका पाहणी केली. पण, त्यावेळी सेलसुरा येथील कृषी शास्त्रज्ञ यांना बोलवण्यात आले होते. मात्र, ते त्या दिवशी न आल्याने या गंभीर प्रकरणाचे भिजत घोंगडे कायमच आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी पुंडलिक केवटे यांनी केली आहे.