मुंबई,
Harmanpreet's Bhangra before the trophy २ नोव्हेंबरच्या संध्याकाळी भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून २०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला. हा भारताचा पहिला महिला विश्वचषक विजय ठरला असून संपूर्ण देशभरात आनंदाचा जल्लोष सुरू आहे.

विजयानंतर झालेल्या सादरीकरण समारंभात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या खास अंदाजात ट्रॉफी स्वीकारली. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते विश्वचषक ट्रॉफी मिळवण्यासाठी ती स्टेजकडे येत असताना हरमनप्रीत भांगडा करत पुढे गेली. तिच्या आनंदी मुद्रेचा आणि आत्मविश्वासाचा तो क्षण पाहून संपूर्ण प्रेक्षकवर्गात जल्लोष उसळला. मात्र, यानंतर घडलेला एक प्रसंग विशेष चर्चेचा विषय ठरला. ट्रॉफी स्वीकारण्यापूर्वी हरमनप्रीत कौर जय शाह यांचे पाय स्पर्श करण्यासाठी वाकली, परंतु जय शाह यांनी तिला नम्रपणे थांबवले. त्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहते या दृश्याचे कौतुक करत आहेत. काहींनी हरमनप्रीतच्या विनम्रतेचे आणि संस्कारांचे कौतुक केले, तर काहींनी जय शाह यांच्या साधेपणाची प्रशंसा केली.
जय शाह यांनी फक्त ट्रॉफीच नाही तर आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून हरमनप्रीत कौर आणि संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. या विजयानं संपूर्ण देशाचं मस्तक अभिमानानं उंचावलं आहे. या विजयासह भारतीय महिला क्रिकेटने नव्या युगात प्रवेश केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने २००५ आणि २०१७ मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न अखेर साकार केलं. मैदानावर दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्द या सर्व गुणांनी भारताने महिला विश्वचषकाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.