कविकुलगुरू कालिदास विद्यापीठात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन
रामटेक,
Ramtek 'Vande Mataram' कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त आज सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या ओलाव्याने भरून गेला. रामटेक कॅम्पसचे संचालक प्रा. हरेकृष्ण अगस्ती, कुलसचिव डॉ. रोशन अलोने, अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ramtek 'Vande Mataram' 'वंदे मातरम्’ च्या एकसुरात झालेल्या गायनाने वातावरण देशभक्तीच्या घोषांनी दुमदुमले. प्रा. हरेकृष्ण अगस्ती यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ इतकेच पवित्र आहे. प्रत्येक भारतीयाने या गीताचे स्मरण आणि गायन करावे.” त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखनकार्याचे कौतुक करत, शब्दांच्या सामर्थ्याने स्वातंत्र्यलढ्यात पेटवलेल्या देशप्रेमाच्या ज्योतीचा उल्लेख केला. कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार देशभरात हे गीतगायन मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे, ज्यायोगे नव्या पिढीला स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची जाणीव होईल. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. जयवंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन डावरे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि संचालन केले.