शमीला टीम इंडियामधून वगळण्यावर प्रशिक्षकाचा संताप

    दिनांक :07-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Shami to Team India भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या निवडीसंबंधी विवाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शमीचे वैयक्तिक प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन यांनी बीसीसीआय आणि निवड समितीवर तीव्र टीका केली आहे. बद्रुद्दीन यांनी म्हटले की, शमीच्या टीम इंडियामधून अनुपस्थितीचे कारण फक्त सबबी आहेत आणि निवड प्रक्रियेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. २०२५/२६ च्या रणजी ट्रॉफीतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये शमीने १५ विकेट्स घेतल्या असूनही, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयच्या अजित आगरकर नेतृत्वाखालील निवड समितीने त्याचा समावेश केला नाही. बद्रुद्दीन यांनी स्पष्ट केले की शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याला बाहेर ठेवण्याचे निर्णय चुकीचे आहेत.
 
 

shami and agarkar 
एका मुलाखतीत बद्रुद्दीन म्हणाले की, रणजी ट्रॉफीतील कामगिरीच्या आधारे कसोटी संघाची निवड केली जावी, पण शमीच्या बाबतीत असे झालेले नाही. गेल्या वेळी शमीला फिटनेसचा मुद्दा मांडून वगळण्यात आले होते, मात्र सध्या तो रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून उत्तम कामगिरी करत आहे. उत्तराखंड आणि गुजरातविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे ७ आणि ८ विकेट्स घेतल्या, म्हणजे दोन सामन्यांमध्ये १५ विकेट्स, तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा समावेश झाला नाही. बद्रुद्दीन यांनी असेही म्हटले की, निवड समितीचे निर्णय पूर्वनियोजित आहेत आणि टी-२० कामगिरीच्या आधारावर कसोटी संघ निवडणे योग्य नाही. त्यांच्या मते, शमीला संघातून वगळणे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि त्याची रणजी ट्रॉफीतील कामगिरी पाहता त्याला संघात स्थान मिळणे आवश्यक होते.