नवी दिल्ली,
40 flights cancelled सोमवारी सकाळी हिवाळ्यातील पहिल्याच दाट धुक्याने दिल्ली-एनसीआर परिसराला पूर्णपणे वेढले. अनेक भागांमध्ये दृश्यमानता शून्य ते केवळ ५० मीटरपर्यंत घसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या धुक्याचा सर्वात मोठा फटका इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीला बसला. कमी दृश्यमानतेमुळे विमानतळावर कॅट-III लँडिंग प्रक्रिया लागू करण्यात आली असली, तरीही उड्डाणांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. वृत्तानुसार, सकाळपासून २०० हून अधिक उड्डाणे उशिराने सुरू झाली, तर सुमारे ४० उड्डाणे रद्द करण्यात आली.
याशिवाय चार उड्डाणे जयपूरसह इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. प्रवाशांना विमानतळावर दीर्घ प्रतीक्षा करावी लागली असून अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. दाट धुक्याचा परिणाम केवळ विमानसेवेपुरताच मर्यादित राहिला नाही, तर रेल्वे वाहतुकीवरही त्याचा फटका बसला. दिल्लीहून येणाऱ्या आणि दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या धुक्यामुळे उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास वेळेत पूर्ण होऊ शकलेला नाही. हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये धुके कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.