तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
fake-birth-and-death-registration : महाराष्ट्र शासनाने 16 सप्टेंबर 2025 रोजी अवैध व विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करण्यात याव्या, असे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असताना आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नोंदी आढळून आल्या आहेत. आर्णी येथील विस्तार अधिकारी (आरोग्य) यांनी तपासणीदरम्यान शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या सीआरएस सॉफ्टवेअरवर 27 हजार 398 जन्म नोंदी व 11 मृत्यू नोंदी आढळून आल्या. प्रत्यक्षात या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे दीड हजार इतकी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदी आढळणे गंभीर बाब ठरली. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना अवगत केली.

घटनेची गंभीरता लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठीत करून शेंदूरसनी ग्रामपंचायतीस भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती 27 हजार 397 जन्म नोंदी व 7 मृत्यू नोंदी या ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढ्या प्रमाणात नोंदी ग्रामपंचायतीमार्फत होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासणीसाठी हे प्रकरण उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजिआ), पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले.
राज्यस्तरीय लॉगिनवरून तपासणीअंती शेंदूरसनी ग्रामपंचायतीचा सी.आर.एस. आयडी मुंबई येथे मॅप असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीसाठी हे प्रकरण भारताचे अतिरिक्तरजिस्ट्रार जनरल कार्यालय व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी), दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले.
11 डिसेंबर 2025 रोजी प्राप्त झालेल्या तांत्रिक तपासणी अहवालानुसार, या नोंदी ‘सायबर फ्रॉड’च्या शक्यतेअंतर्गत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रशासनाने केले आवाहन
जिल्ह्यातील सर्व निबंधक जन्म-मृत्यू यांना आपले सीआरएस.आयडी, पासवर्ड व ओटीपी कोणालाही देऊ नयेत तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित जिल्हा स्तरावर कळवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) यांनी केले आहे.