वर्धा,
e-buses : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला १२ ई-बसेस मिळाल्या आहेत. प्रवाशांना आणखी चांगली प्रवासी वाहतूक सेवा देणार आहे. या बसेसच्या फेर्यांचे नियोजन वर्धा आणि हिंगणघाट आगाराच्या वतीने करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात रापमचे पाच आगार आहेत. वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव आगाराच्या वतीने दररोज शहरी व ग्रामीण भागासाठी बसेस सोडल्या जातात. रापमचा वर्धा विभागाकडे उपलब्ध असलेल्या २२३ बसेसच्या जोरावर हल्ली प्रवाशांना प्रवासी वाहतूक सेवा देण्यात येत आहे. १७ रोजी रापमच्या वर्धा विभागाच्या ताफ्यात १२ नवीन ई-बसेसची भर पडली आहे.
रापमचे विभाग नियंत्रण कार्यालय सेवाग्राम मार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरात आहे. याच परिसरात रापमची विभागीय कार्यशाळाही आहे. १२ ई-बसेस रापमच्या वर्धा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. ई-बसेस नागपूर, अमरावती, यवतमाळसाठी पाठविल्या जाणार असून अकोला फेरीचाही आमचा मानस असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.