रद्द सामना भारताला विजयाकडे नेणारा! कसे ते वाचा

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
लखनौ,
Leading India to victory लखनौमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला असून, याचा थेट फायदा टीम इंडियाला झाला आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या मालिकाविजयाच्या आशांवर पाणी फेरले आहे. सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक आणि ७ वाजता सामना सुरू होणार होता. मात्र, दाट धुके आणि मैदानावरील ओलसर परिस्थितीमुळे पंचांनी वारंवार पाहणी करूनही सामना खेळण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मालिकेत आतापर्यंत चार सामने नियोजित होते, त्यापैकी तीन सामने खेळले गेले आहेत.
 
 
 
t20 india team
त्यामध्ये भारताने दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे, तर दक्षिण आफ्रिकेला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. चौथा सामना रद्द झाल्यामुळे आता मालिकेत फक्त एकच सामना शिल्लक राहिला आहे. अशा परिस्थितीत शेवटचा सामना जिंकला, तरी दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकता येणार नाही. भारत शेवटचा सामना जिंकल्यास मालिका थेट आपल्या नावावर करेल, तर पराभव झाला तरी मालिका बरोबरीत सुटेल. त्यामुळे लखनौतील सामना रद्द होणे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरले आहे.
 
दरम्यान, मालिकेतील निर्णायक आणि अखेरचा टी-२० सामना शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ लखनौहून अहमदाबादकडे रवाना झाले असून, या सामन्यावर मालिकेचा अंतिम निकाल अवलंबून असणार आहे. अहमदाबादमध्ये सामना होण्याची शक्यता चांगली असली, तरी अंतिम निर्णय हवामानावरच अवलंबून असेल.