मस्कत,
Modi's message during his visit to Oman पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी ओमानमध्ये पोहोचल्यावर मस्कतमधील शिखर परिषदेत दिलेल्या भाषणात भारत-ओमान मैत्रीवर भर दिला. त्यांनी उपस्थितांसमोर नमस्कार करून भाषणाची सुरुवात करताना म्हटले की, “येथे संपूर्ण वातावरण तरुणाईच्या उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहे. माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना, जे प्रत्यक्ष येथे नसले तरी जवळच्या स्क्रीनवर लाईव्ह पाहत आहेत, मी अभिवादन करतो. मला येथे एक छोटा भारत दिसतो; मल्याळम, तमिळ, तेलगू, मराठी आणि गुजराती बोलणारे बरेच लोक येथे आहेत.

भारत आणि ओमानमधील मैत्रीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, समुद्राच्या लाटा बदलतात, ऋतू बदलतात, पण भारत-ओमान मैत्री प्रत्येक ऋतूसोबत अधिक मजबूत होते. ती प्रत्येक लाटेसोबत नवीन उंची गाठते. आम्ही प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा आदर करतो. ही शिखर परिषद भारत आणि ओमानच्या प्रगतीला नवीन दिशा देईल. मोदी पुढे म्हणाले की, आज आपण ऐतिहासिक निर्णय घेणार आहोत, ज्याचे प्रतिध्वनी वर्षानुवर्षे ऐकू येतील. आमचे नाते विश्वासाच्या पायावर बांधले गेले आहे.त्यांनी भारत-ओमान संबंधांना ७० वर्ष पूर्ण झाले असल्याचे सांगितले आणि या मैत्रीला अधिक दृढ बनवण्याचे महत्व अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी भारत-ओमान भागीदारीला नव्या स्तरावर नेण्यावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, सात वर्षांनी ओमानला भेट देण्याचे भाग्य मला लाभले आहे. आजची शिखर परिषद भारत-ओमान भागीदारीला नवीन दिशा आणि गती देईल. प्रत्येक क्षेत्रात नवोपक्रमाला चालना दिली पाहिजे. आम्ही व्यापारापासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात भागीदारी वाढवू, ज्यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. मोदी यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवरही भाष्य करत म्हटले की, गेल्या ११ वर्षांत भारताने आपला आर्थिक डीएनए बदलला आहे. विविधतेत एकता हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. आपण लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, ज्यामुळे ओमानला अनेक फायदे मिळतील. भारत-ओमानचा इतिहास पिढ्यांशी जोडलेला आहे, आपण नव्या आत्मविश्वासाने आणि उर्जेने पुढे जाऊ. मोदी यांच्या या भाषणातून भारत-ओमान भागीदारीला नव्या उंचीवर नेण्याची स्पष्ट योजना दिसून आली, ज्यात व्यापार, शिक्षण आणि नवोपक्रम यांचा समावेश आहे.