वर्धा,
forgot-to-ink-his-finger : जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांमध्ये आज मंगळवार २ रोजी मतदान झाले. पारदर्शक आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यातील २८७ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, वर्धा शहरातील दोन मतदान केंद्रांवर अनियमितता आढळून आली. एका ठिकाणी ईव्हीएम बिघाड झाल्याने ते ईव्हीएम बदलावे लागले. दुसर्या ठिकाणी मतदाराच्या बोटावर शाई लावण्यात आली नाही. त्यामुळे थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील २८७ मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले.

वर्धा येथील ८९, हिंगणघाट येथील १०४, आर्वी ४३, पुलगाव येथील ३२ आणि सिंदी येथील १९ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सरस्वती विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजताच्या सुमारास ईव्हीएम बिघाड झाल्याने अर्धा तास मतदान थांबवावे लागले. ईव्हीएमची बदली केल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. एका मतदान केंद्रावर मतदाराने मतदान केले मात्र, कर्मचारी त्याच्या बोटावर शाई लावण्यास विसरल्याने काही वेळ येथेही गोंधळाची स्थिती दिसून आली. तर हिंगणघाट येथील एका मतदान केंद्रावर असाच प्रकार घडला. अधिकार्याने मतदाराची नोंद घेतली मात्र त्याच्या बोटाला शाई लावणे विसरले. यादरम्यान मतदाराने मतदान करून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच आपण बोटाला शाई लावण्याचे विसरल्याचे लक्षात येताच अधिकार्याने त्या मतदाराला आवाज देऊन त्यांच्या बोटाला शाई लावून आपले कर्तव्य पार पाडले.