वर्धा,
martyrdom-centenary-celebration : हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करुन समाज जोडण्याचे काम केले. धर्मांतर रोखण्यासाठी बलीदान दिले. त्यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम कार्यक्रमातून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधवांसोबत इतर समाजामध्ये एकतेची भावना निर्माण होऊन समाज जोडण्याचे काम होईल, असे प्रतिपादन गुरू तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम राज्यस्तरीय आयोजन समितीचे सदस्य किसन राठोड यांनी केले.
हिंद-दी-चादर गुरू तेग बहादुर साहिबया शहिदी शताब्दी समागमानिमित्त नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाची जनजागृती व साहिबयक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, नागपूर विभागाचे धर्मजागरण समिती प्रमुख सदाशिव चव्हाण, संतोष राठोड, श्रीकांत राठोड, राजाराम राठोड, श्रीराम जाधव, गुरुमुखसिंह बावरा, सदस्य जसवंतसिंह अंधरेले, जोगींदरसिंग बावरी, बलदेवसिंह टांक आदी उपस्थित होते.
७ रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी व इतर समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. नागपूर येथे कार्यक्रमासाठी येणार्या भाविकांच्या व्यवस्थेची माहिती देखील त्यांनी घेतली.