तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगरपरिषद वगळता 9 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीत मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. दुपारी 3.30 पर्यंत जिल्ह्यात 45.53 टक्के मतदान पार पडले. मतदानासाठी ठिकठिकाणी मतदारांनी गर्दी केली होती. या सर्व नगर परिषदांची मतमोजणी नवीन जाहीर झालेल्या कार्यक्रमांनुसार 21 डिसेंबर रोजी होणार आहे.
मतदान क्षेत्रातील 3 लाख 30 हजार 656 मतदारांसाठी 390 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. यात स्त्री मतदारांची संख्या 1 लाख 65 हजार 234, पुरूष मतदारांची संख्या 1 लाख 65 हजार 404 आहे. तर इतर मतदारांची संख्या 18 आहे. यापैकी दुपारी 3.30 पर्यंत 1 लाख 50 हजार 542 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्यावर जाईल असा तज्ञांचा अंदाज आहे.
दुपारी 3.30 पर्यंत आर्णी नगर परिषदेसाठी 26 हजार 857 मतदारांपैकी 12 हजार 116 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 45.11 टक्के होती. घाटंजी नगर परिषदेसाठी 16 हजार 291 मतदारांपैकी 7 हजार 609 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 46.71 टक्के होती. वणी नगर परिषदेसाठी 49 हजार 571 मतदारांपैकी 23 हजार 75 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 46.55 टक्के होती.
दिग्रस नगर परिषदेसाठी 37 हजार 375 मतदारांपैकी 18 हजार 290 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 48.94 टक्के होती. उमरखेड नगर परिषदेसाठी 40 हजार 670 मतदारांपैकी 17 हजार 995 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 44.25 टक्के होती. पुसद नगर परिषदेसाठी 63 हजार 232 मतदारांपैकी 25 हजार 12 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 39.56 टक्के होती.
दारव्हा नगर परिषदेसाठी 29 हजार 898 मतदारांपैकी 14 हजार 197 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 47.48 टक्के होती. पांढरकवडा नगर परिषदेसाठी 26 हजार 726 मतदारांपैकी 12 हजार 91 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 45.24 टक्के होती. नेर नगर परिषदेसाठी 26 हजार 328 मतदारांपैकी 12 हजार 317 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 46.78 टक्के होती. तर ढाणकी नगर पंचायतसाठी 13 हजार 708 मतदारांपैकी 7 हजार 840 मतदारांनी हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 57.19 टक्के होती.
जिल्ह्यात कुठेही निवडणुकीला गालबोट लागले नसले तरी उमरखेड येथे प्रभाग क्र. 7 च्या एका बुथवर दोन गटांत हाणामारी झाली. तर घाटंजी येथे दोन उमेदवारांमध्ये हातापायी झाल्याची चर्चा रंगली होती. या दोन्हीही घटनांमध्ये वृत्त लिहिपर्यंत पोलिस तक्रार करण्यात आली नव्हती.