मुंबई,
BJP leads in the results. राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या 2025 च्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अवघ्या 10 मिनिटांतच सुरुवातीचे कल समोर आले असून भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. या पहिल्या कलांमध्ये भाजपा 111 जागांवर आघाडीवर आहे, तर शिंदे गट 39 आणि अजित पवार गट 31 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 37, ठाकरे गट 5 आणि शरद पवार गट 9 जागांवर आघाडीवर आहेत. युतीत 181 जागांवर तर महाविकास आघाडी 50 जागांवर आघाडीवर दिसत आहे. स्थानिक आघाड्यांनी सहा जागांवर आघाडी घेतलेली आहे.
सुरुवातीच्या कलांवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांची एकमेकांविरोधात लढत अधिक स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लढले, तर काही ठिकाणी स्वबळावरच मैदानात उतरले. त्यामुळे अनेक भागांत बहुरंगी लढती घडत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसाठी प्रचंड प्रचार केला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महाविकास आघाडीचे बडे नेते फारसा प्रचार करताना दिसले नाहीत. शरद पवार यांनी काही सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरे यांनी एकही सभा घेतलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला वातावरण निर्माण करण्यात अडचणी आल्या. या निवडणुकीत राणे कुटुंब, एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, गोपिचंद पडळकर, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यांची गड राखण्याची किंवा गमावण्याची लढत सुरू आहे.