कोलंबो,
Sri Lankan Navy operation श्रीलंकेच्या नौदलाने रामेश्वरम येथून मासेमारीसाठी गेलेल्या १२ भारतीय मच्छिमारांना अटक करत त्यांची एक मासेमारी बोट जप्त केली आहे. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याचा आरोप या मच्छिमारांवर ठेवण्यात आला आहे. चेन्नईहून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यातील ही भारतीय मच्छिमारांच्या अटकेची आठवी घटना असून, काही दिवसांपूर्वीच २९ मार्च रोजी श्रीलंकेच्या नौदलाने आणखी १६ मच्छिमारांना ताब्यात घेतले होते. ही ताजी कारवाई उत्तर श्रीलंकेतील डेल्फ्ट बेटाच्या समुद्र परिसरात करण्यात आली. माशांनी समृद्ध असलेल्या या भागात मासेमारीसाठी भारतीय मच्छिमार वारंवार जातात. मात्र, आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेच्या वादामुळे त्यांना अनेकदा अटक आणि कारवाईला सामोरे जावे लागते. या सततच्या घटनांमुळे तामिळनाडूतील मच्छिमारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
तामिळनाडू सरकारने यापूर्वीही अनेक वेळा केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून, अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांची तातडीने सुटका व्हावी यासाठी श्रीलंकेशी राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याची विनंती केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या ११ मच्छिमारांना श्रीलंकेच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर त्यांची सुटका झाली असली, तरी त्यांच्या बोटी सोडण्याबाबतचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.
मार्च महिन्यातच श्रीलंकेच्या नौदलाने ५० हून अधिक भारतीय मच्छिमारांना अटक केल्याची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर सहकारी मच्छिमारांच्या सुटकेसाठी तामिळनाडूमधील विविध किनारपट्टी भागांत मच्छिमारांनी आंदोलन आणि संपही केले आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच झालेल्या भारत–श्रीलंका चर्चेदरम्यान श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जी. एल. पेरिस यांच्यापुढे भारतीय मच्छिमारांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज अधोरेखित केली आहे.