आनंदवार्ता... शेतकरी राजा होणार चिंतामुक्त

जिल्ह्यात २ हजार २१४ सौर कृषिपंप

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
वर्धा,
solar agriculture pump शेतात दिवसा सिंचन करण्याचे स्वप्न साकार करणार्‍या, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेने महाराष्ट्राच्या शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. आता या योजनेचा लाभ घेताना किंवा देखभाल करताना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शेतकर्‍यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून, घरबसल्या एका लिकवर आपल्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे. सौर कृषिपंप बसवताना विलंब होत असेल किंवा सुरू असलेल्या पंपात तांत्रिक बिघाड झाल्यास आता थेट ऑनलाइन दाद मागता येईल. महावितरणने यासाठी विशेष तक्रार निवारण पोर्टल सज्ज केला आहे. तक्रारीचा मागोवा घेण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे.
 

solar agriculture pump  
शेतकरी बांधवांनो, solar agriculture pump आपली तक्रार नोंदवण्यासाठी सौर कृषिपंप धारकाने सर्वप्रथम महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर होम पेजवर डाव्या बाजूला असलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या टॅबवर लिक करावे. तेथील तक्रार निवारण टॅबवर जाऊन तिथे (तक्रार नोंदवा) हा पर्याय दिसेल, त्यावर लिक करा. त्यानंतर तक्रार निवारण विभागात जाऊन तक्रार नोंदवताना आपला लाभार्थी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक किंवा जिल्हा, तालुका, गाव आणि लाभार्थीचे नाव टाकून शोधा व त्यानंतर आपली समस्या सविस्तर लिहा किंवा तक्रारीच्या स्थितीचा आढावा देखील तुम्ही याच पोर्टलवर पाहू शकता.
 
 
वर्धा मंडलाची यशस्वी वाटचाल
जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सौर ऊर्जेवर यशस्वीपणे शेती फुलवत आहेत. मागेल त्याला सौर पंप योजना, मुख्यमंत्री सौर पंप योजना आणि अटल सौर पंप योजनांतर्गत जिल्ह्यातील २ हजार २१४ शेतकर्‍यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात वर्धा जिल्ह्यातून आलेल्या सर्व तांत्रिक तक्रारींचे महावितरणने यशस्वीपणे निवारण केले आहे. यामुळे शेतकर्‍यांचा या योजनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.