कारंजा लाड,
soybean trading fraud case कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६० टन सोयाबीन जप्त केले असून, मध्यप्रदेशातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी अरविंद मदनचंद गोलेच्छा (वय ५७ ), व्यवसायिक रा. कारंजा यांनी कारंजा शहर पोलिस ठाण्यात जबानी तक्रार दाखल केली होती. गोलेच्छा हे मागील २५ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत आहे.तक्रारीनुसार आरोपी ऋषभ शोभालालजी चंदेल, रवींद्र गोपालजी बोहरा, पुष्कर पाटीदार (सर्व रा. जावळ, ता. जावळ, जि. निमज, राज्य मध्यप्रदेश) यांनी फिर्यादीस खोटे आश्वासन देऊन १८ लाख २४ हजार २१७ रुपये किमतीचे सोयाबीन खरेदी केले. मात्र, त्याचे पैसे न देता विश्वासघात केला. पैसे मागितल्यावर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी कारंजा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३५१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशातील जावळ (जि. निमज) येथे विशेष पथक रवाना करण्यात आले होते.
या पथकात पोलिस उपनिरीक्षक वसंत ठाकरे, पोहेकॉ मयुरेश तिवारी, पोकॉ योगेश मनवर यांचा समावेश होता. पोलिसांनी कारवाई करत आरोपी ऋषभ चंदेल व रवींद्र बोहरा यांना ताब्यात घेतले असून, त्यांनी विश्वासघात करून आणलेला संपूर्ण ६० टन सोयाबीन माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वसंत ठाकरे करीत आहेत.