तिवसा,
dahegaon-dam : शेतकर्यांना रब्बी हंगामाच्या पीक पेरणीसाठी नोव्हेंबरमध्येच धरणाचे पाणी मिळणे अनिवार्य होते. मात्र, मृद जलसंधारण विभागाने तब्बल एक महिना फक्त धरणाच्या कॅनाल दुरुस्तीतच घातल्याने अखेर शेतकर्यांची पेरणी लांबणीवर पडली होती. परिणामी या संदर्भात शिरजगाव मोझरी, धोत्रा, अनकवाडी, मालधूर येथील शेतकर्यांनी तातडीने कॅनाल व बंधार्याची दुरुस्तीचे कामे पूर्ण करून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दहेगाव धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान मृद जलसंधारण विभागाने शुक्रवारी ११ वाजताच प्रशांत कांबळे आणि धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे यांच्या उपस्थितीत पाणी सोडल्याने सुरू होण्यापूर्वीच या लढ्याला यश प्राप्त झाले.

गेल्या एक महिन्यांपासून दहेगाव धरणाच्या पाण्यासाठी शिरजगाव, धोत्रा, अनकवाडी आणि मालधुरच्या शेतकर्यांची प्रतीक्षा होती. त्यानंतर या संदर्भात शिरजगाव येथील शेतकर्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्याकडे आपली समस्या मांडली. त्यावरून सलग तीन दिवस मृद जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क आणि तक्रारी केल्यानंतर कार्यकारी अभियंता निकिता देशमुख यांनी बुधवारी दहेगाव धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली होती.
त्यानंतरही कॅनालच्या बंधार्यांची कामे अपूर्ण असल्याने आणि संबंधित ठेकेदाराकडे मजूर कमी असल्याने पाणी सोडण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, प्रशांत कांबळे यांनी संबंधित शेतकर्यांसोबत धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर मृद जलसंधारण विभागाने दुरुस्तीच्या कामाचा वेग वाढवला. शिवाय, कंत्राटदाराला सुद्धा प्रशासनाने तंबी दिली. परिणामी शुक्रवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे, शिरजगाव ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम मेश्राम, हर्षल मेश्राम, जयंत तायवाडे, निमचंद कोचर, प्रमोद जाधव, अमोल बद्रे, जीवन गजभे, सदानंद भालेराव आदी शेतकर्यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.