नवी दिल्ली,
Land acquisition in the Bharatmala project भारतमाला प्रकल्पांतर्गत भूसंपादन प्रकरणी ईडीने छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. रायपूर ते विशाखापट्टणम रस्त्याच्या भूसंपादन भरपाईच्या देयकांमध्ये कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रायपूर आणि महासमुंदमध्ये किमान नऊ ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. या कारवाईत हरमीत सिंह खानुजा, त्यांच्या कथित सहकाऱ्यांबरोबर काही सरकारी अधिकारी आणि जमीन मालकांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, संपूर्ण प्रकरण भारतमाला प्रकल्पाच्या आर्थिक कॉरिडॉरच्या भूसंपादन भरपाईशी संबंधित असून, रायपूर-विशाखापट्टणम मार्गावर लक्ष केंद्रीत आहे. भारतामाला प्रकल्पामध्ये सुमारे २६,००० किमी लांबीच्या आर्थिक कॉरिडॉरचा विकास करण्याची योजना आहे. यामुळे बहुतेक मालवाहतूक रस्त्यांवरून होईल अशी अपेक्षा आहे, तसेच सुवर्ण चतुर्भुज आणि उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम कॉरिडॉर देखील यात समाविष्ट आहेत.