कोलकाता,
Controversial warning from TMC MLA पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे बेलडांगा येथील आमदार हुमायून कबीर यांनी बाबरी मस्जिदीच्या धर्तीवर नवीन मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा करत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग ३४ मुस्लिमांच्या नियंत्रणाखाली असेल.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षाविरोधात बंडखोर भूमिकेसाठी ओळखले जाणारे कबीर यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनावर आरएसएसचे आदेश पाळत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मी एक वर्षापूर्वीच मशिदीसाठी भूमिपूजन करणार असल्याची घोषणा केली होती, मग अचानक अडथळा का? तुम्ही भाजपच्या निर्देशावर काम करत आहात का?” त्यांनी राज्य प्रशासनाला “आगीशी खेळू नका” असा इशारा देत शांततापूर्ण कार्यक्रमात हस्तक्षेप झाल्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी व्यक्त केली. मुर्शिदाबादमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित असतानाच या विधानांमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत की तृणमूल पक्ष अजूनही या आमदाराविरोधात कारवाई का करत नाही. पक्षाने तात्काळ कबीर यांच्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवले. राज्याचे मंत्री व जमियत उलेमा-ए-हिंद (बंगाल) अध्यक्ष सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी कबीर यांच्या विधानांवर नाराजी दर्शवली आणि राज्यात “धोकादायक भावनिक वातावरण” तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
तृणमूलचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांनी कबीर यांच्या राजकीय वजनालाच नाकारत म्हटले, लोकांचा विश्वास फक्त आणि फक्त ममता बॅनर्जींवर आहे; अशा विधानांना काहीही महत्त्व नाही.” पक्षाने कबीर हे “वैयक्तिक पातळीवर” काम करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष भाजपने तृणमूलवरच प्रतिहल्ला चढवला. प्रदेश भाजप अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी आरोप केला की, “तृणमूल बंगालला जाणीवपूर्वक अस्थिरतेकडे ढकलत आहे. अशा प्रकारची विधाने धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न आहेत.