नागपूर,
Maharashtra Animal and Fishery Sciences University Nagpur महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) आपला २५ वा स्थापना दिन साजरा करत आहे. ३ डिसेंबर २००० रोजी सुरू झालेल्या या विद्यापीठाने “शिक्षण, संशोधन आणि विस्तार” या त्रिसूत्री ध्येयावर कार्य करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला विज्ञानाधिष्ठित बळकटी देत उल्लेखनीय कार्य केले आहे. स्थापनेच्या वेळी पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये, एक पदव्युत्तर संस्था आणि एक दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय हस्तांतरित झाल्यानंतर, पुढील काळात माफसूने दोन मत्स्य विज्ञान महाविद्यालये, एक अतिरिक्त दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि तीन कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करून मोठा शैक्षणिक विस्तार साधला.
गेल्या पंचवीस Maharashtra Animal and Fishery Sciences University Nagpur वर्षांत पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, मत्स्य संवर्धन, रोगनियंत्रण, जैवतंत्रज्ञान आणि पशुजनुकशास्त्र या क्षेत्रांत माफसूने राज्य व देशपातळीवर संशोधनाची नवी मापदंडे निर्माण केली. लसीकरण मॉडेल्स, जैवसुरक्षा पद्धती, उत्पादनवाढीचे जनुक संशोधन, मत्स्य संवर्धनातून ब्लू इकॉनॉमीचा विकास, दुग्ध उद्योगातील वॅल्यु एडिशन आणि फूड सेफ्टीचे उच्च मापदंड ही विद्यापीठाची ठळक यशे ठरली आहेत. शेतकरी, पशुपालक, दुग्ध उत्पादक आणि मच्छीमार यांच्यासाठी राबविलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे उद्योजकता आणि रोजगारक्षमतेला नवी दिशा मिळाली. धोरणनिर्मितीमध्ये सरकारचे विचारकेंद्र (थिंक टँक) म्हणून माफसूचे योगदानही लक्षणीय ठरले आहे. ग्रामीण आरोग्य, पशुकल्याण आणि वन्यजीव संवर्धनातही विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माफसू आज ग्रामीण विकासाचा प्रेरणास्रोत आणि विज्ञानाधिष्ठित प्रगतीचे केंद्र म्हणून सक्षमपणे उभे आहे. भविष्यदृष्टी म्हणून तंत्रज्ञानाधारित शिक्षण अधिक मजबूत करणे, ग्रामीण युवक व महिलांना स्वावलंबी बनवणे, हरित–निळ्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जैवसुरक्षा व खाद्य सुरक्षा बळकट करणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. माफसूचा स्थापना दिन हा भूतकाळातील यशाचा अभिमान, वर्तमानातील कार्याचा संकल्प आणि भविष्यावरच्या विश्वासाचा उत्सव ठरला असल्याचे प्रवीण बागडे यांनी सांगितले आहे.