बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
ढाका,
Third Hindu murdered in Bangladesh बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्य दिसून येत असून, मैमनसिंग जिल्ह्यात आणखी एका हिंदू व्यक्तीचा जीव गेला आहे. ग्रामीण निमलष्करी दल ‘अन्सार’मध्ये कार्यरत असलेले बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्याच दलातील सहकारी नोमान मियाँ याला अटक करण्यात आली आहे. ही घटना भालुका उपजिल्ह्यातील मेहराबारी परिसरात असलेल्या सुलताना स्वेटर लिमिटेड या कारखान्यात घडली. या कारखान्याच्या सुरक्षेसाठी सुमारे वीस अन्सार जवान तैनात होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बजेंद्र बिस्वास आणि नोमान मियाँ हे दोघे एका खोलीत बसले असताना अचानक नोमानने कोणताही वाद नसताना बजेंद्रवर बंदूक रोखली आणि गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या मांडीला लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
 
hindu
 
बजेंद्र बिस्वास हे सिल्हेट सदर उपजिल्ह्यातील कादिरपूर गावचे रहिवासी होते. ते अन्सार दलात कार्यरत होते आणि कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आरोपी नोमान मियाँ हा सुनामगंज जिल्ह्यातील ताहिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. लबीब ग्रुपसाठी नियुक्त अन्सारचे प्रभारी अधिकारी एपीसी मोहम्मद अझहर अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कोणताही वाद किंवा भांडण सुरू नव्हते. अचानक घडलेल्या या गोळीबाराने सर्वजण हादरून गेले. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बजेंद्र आणि नोमान यांच्यात यापूर्वी कोणतेही वैमनस्य नव्हते.
 
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच मैमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीची अमानुष हत्या करण्यात आली होती. त्यांना मारहाण करून झाडाला बांधण्यात आले आणि नंतर जाळून ठार मारण्यात आले होते. त्यामुळे हा जिल्हा पुन्हा एकदा अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे चर्चेत आला आहे. अन्सार हे मुख्यत्वे गाव, कारखाने आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले निमलष्करी दल आहे. मात्र, याच दलातील सदस्याकडून झालेल्या या हत्येमुळे हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही हत्या वैयक्तिक कारणातून झाली की अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या मोठ्या कटाचा भाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करत असून, बांगलादेशातील वाढत्या कट्टरतावादावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.