चंद्रपूर,
tadoba-andhari-tiger-project : महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील जटायू संवर्धन प्रकल्पातील पाच पांढऱ्या पाठीच्या गिधाडांना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी निसर्गात मुक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात 'बीएनएसएच'चे प्रवीणसिंह परदेशी यांच्या शुभहस्ते गिधाडांना 'प्री रिलीज एवियरी'चे दार उघडून निसर्गात यशस्वीपणे मुक्त करण्यात आले. हे गिधाडे हरियाणा राज्यातील पिंजोर येथून एप्रिल २०२५ मध्ये आणून 'प्री रिलीज एवियरी' मध्ये सोडण्यात आले होते. या गिधाडांना सैटलाइट (दोन गिधाडांना) व 'जीएसएम' टैग (तीन गिधाडांना) लावण्यात आले. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल व सदर बाब गिधाडांच्या अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरेल.
गिधाडे ही पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाची पक्षी प्रजाती असून, परिसंस्थेचा समतोल राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मात्र, मागील काही वर्षांत विविध कारणांमुळे गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ही बाब लक्षात घेता गिधाड संवर्धनासाठी जटायू संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत संरक्षण, पुनर्वसन व निसर्गात पुनर्स्थापनाचे कार्य केले जात आहे.
बोटेझरी येथे कार्यक्रमात वनविभागाचे अधिकारी डॉ जितेंद्र रामगावकर, डॉ प्रभू नाथ शुक्ल, अनिरुद्ध ढगे, विवेक नातू, रुंदन कातकर आदी उपस्थित होते.