तिरुवनंतपुरम–अहमदाबादची उड्डाणे रद्द, दिल्ली–बेंगळुरू तिकिटे ₹५०,००० वर

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Thiruvananthapuram-Ahmedabad flights cancelled इंडिगो एअरलाइन्सच्या संकटाचा आज पाचवा दिवस असून परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. तिरुवनंतपुरम, अहमदाबादसह देशातील अनेक विमानतळांवरून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. शनिवारीदेखील तिरुवनंतपुरम आणि अहमदाबादहून येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली. तिरुवनंतपुरम विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, आज एकूण १२ उड्डाणे रद्द करण्यात आली, तर आतापर्यंत तीन देशांतर्गत आगमन आणि तीन देशांतर्गत प्रस्थान उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
 
 
flights cancelled
 
 
इंडिगोच्या उड्डाणे रद्द होत राहिल्याने इतर विमान कंपन्यांच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीहून बेंगळुरूला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्पाइसजेटच्या तिकिटांसाठी तब्बल ₹५०,००० पर्यंत भरण्याची वेळ आली आहे. वाढत्या किमती आणि रद्दीकरणांमुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत. या दरम्यान दिल्ली विमानतळाने एक सूचना जारी करून सांगितले आहे की, इंडिगोची उड्डाणे काही काळ खंडित झाल्यानंतर हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. प्रवाशांनी घरी जाण्यापूर्वी आपले बुकिंग आणि फ्लाइटची अद्ययावत स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
उड्डाणे रद्द होण्याच्या सततच्या मालिकेत भारतीय रेल्वे प्रवाशांचा आधार बनली आहे. अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने ३७ गाड्यांना एकूण ११६ अतिरिक्त कोच जोडले आहेत. त्यामुळे अनेकांना पर्यायी प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. एफडीटीएल नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर इंडिगोने मर्यादित प्रमाणात उड्डाणे पुन्हा सुरू केली असली, तरी परिस्थिती सामान्य होण्यासाठी अजून काही दिवस लागतील, असे इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी स्पष्ट केले आहे. चेक-इन काउंटरवर अजूनही लांबच लांब रांगा दिसत आहेत आणि अनेक प्रवाशांना पुढील उड्डाणासंबंधी अनिश्चिततेला सामोरे जावे लागत आहे. इंडिगोच्या संकटामुळे निर्माण झालेल्या या गोंधळात प्रवाशांची गैरसोय टळण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीत.