गडचिरोली,
Irapundi village गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एक अत्यंत अनोखे गाव आहे—इरपुंडी. महाराष्ट्रातील इतर गावांपेक्षा हे गाव पूर्णपणे वेगळे आहे कारण येथे संपूर्ण गावात फक्त एकच घर आहे आणि त्यात राहणारे कुटुंब गावाची एकूण लोकसंख्या बनवते. जेडे कुटुंबातील अवघे सात सदस्य हे इरपुंडीचे एकमेव रहिवासी आहेत.
इरपुंडी हे गाव Irapundi village गडचिरोली शहरापासून सुमारे ४२ किमी अंतरावर, घनदाट जंगलात वसलेले आहे. गावाजवळील मोठे गाव तुकुम आहे, जे फक्त ५ किमी अंतरावर आहे. तुकुमपासून इरपुंडीपर्यंत १ किमी कच्चा मातीचा रस्ता आहे, तर जेडे कुटुंबाच्या घरापर्यंत सरकारने काँक्रीटचा रस्ता बांधला आहे, ज्यामुळे हे घर काही अंशी शहराशी जोडलेले आहे.या कुटुंबाचे नेतृत्व ६० वर्षीय यशोदा जेडे करतात. त्यांच्या कुटुंबात तीन मुले, एक सून आणि दोन नातवंडे राहतात, तर एक मुलगा आणि सून जवळच्या तुकुम गावात राहतात. यशोदाबाई सांगतात की पतीच्या मृत्यूनंतर खूप संघर्ष झाला, तरीही नातेवाईकांच्या सहाय्याने त्यांनी जीवन पुढे नेले.कुटुंबाचा उदरनिर्वाह भातशेती, गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढ्या आणि कोंबड्यांवर अवलंबून आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना जवळच्या तुकुम गावावर अवलंबून रहावे लागते. यशोदाबाई म्हणतात, “आमचे पूर्वज पिढ्यानपिढ्या येथेच राहत आले आहेत. जंगलात वाघ-हत्ती असले तरी आम्हाला कधीही भेटले नाही आणि भीती कधीही वाटलेली नाही.”गडचिरोली जिल्ह्यात अशा विरळ लोकवस्तीच्या अनेक गावे वाडे आहेत. फक्त धानोरा तालुक्यातच १०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली ३५ गावे नोंदली गेली आहेत. घनदाट जंगल आणि अत्यल्प लोकसंख्या यामुळे प्रशासनाला आरोग्यसेवा, शिक्षण आणि सरकारी योजना पोहोचवणे फारच कठीण ठरते. लोक दिवसभर शेत किंवा जंगलात असल्याने त्यांच्या घरी पोहोचणेही सोपे नाही.इरपुंडी हे गाव महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि अनोख्या स्वरूपाचे आहे, जिथे संपूर्ण गाव फक्त एका घरावर आधारित आहे. या गावाची कथा निसर्गाशी जुळलेल्या शांतीपूर्ण जीवनाची, संघर्षांची आणि कुटुंबीयांच्या एकजुटीची साक्ष देणारी आहे.